भुलेश्वर -पुरंदर तालुका हा एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र या तालुक्यात पुरंदर उपसा सिंचन योजना आली आणि येथील शेतकरी बांधवाना नवसंजीवनी मिळाली. एकेकाळी शेतात पाणी नाही म्हणून आपली शेती पडीक ठेवणारा शेतकरी बांधव आपली शेती बारमाही फुलवू लागला व पुरंदरची शेती हिरवीगार दिसू लागली. या शेतात विविध पिकासोबत भाजीपाला, फळबागा, फुले दिसू लागली.
जवळपास गेल्या पंधरा दिवसांपासून जगभरात थैमान घातलेल्या करोना या विषाणूजन्य आजारामुळे पुणे, मुंबई सारख्याच नव्हे तर ग्रामीण भागातील फुल मार्केट व मंदिरे त्यासोबत फुले विक्रीची दुकाने बंद असल्याने फुल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतात तोडणीला आलेली फुले तशीच वाया जाऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थिक फटका बसू लागला आहे.
गुलछडी या फुलांचा फुलदाणी, वेणी, गजरा, पुष्पहार व पुष्पगुच्छ यासाठी सर्रास वापर केला जातो, त्यामुळे या फुलांना बाजारात वर्षभर मागणी असते. वर्षभर पुरवठा करण्यासाठी या फुलांची लागवड हरितगृहामध्ये केली जाते. महाराष्ट्रात पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सांगली, ठाणे या जिल्ह्यात गुलछडीची लागवड केली जाते. कटफ्लॉवर म्हणून मोठमोठ्या शहरातून या फुलांचा उपयोग केला जातो. या शहरातून अशा फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे.
वर्षभर पुरवठा करण्यासाठी शेतकरी जरबेरा, कार्नेशन यांसारखी लांब दांड्याच्या फुलांची लागवड करीत आहेत. निशिगंध हे उष्णकटिबंधातील बहुवर्गीय झाड असून एकदा लागवड केल्यास त्याच हरितगृहात सतत तीन वर्षेपर्यंत ठेवता येते. वर्षभर सतत फुले, फुलदांडे मिळवण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात लागवड करतात.
दिवस व रात्रीच्या कालावधीचा सुध्दा गुलछडीच्या वाढीवर परिणाम होत असल्याने हरितगृहात कृत्रिम प्रकाश लावून प्रकाशाची तीव्रता जास्त वेळ वाढविल्यास चांगल्या प्रतीची फुले, फुलदांडे मिळू शकतात. डबल जातींच्या फुलावर कमी प्रकाश तीव्रतेचा परिणाम होत नाही.
मोठ्या दिव्यामध्ये प्रकाशाची तीव्रता समाधानकारक असल्यामुळे झाडांची शाखीय वाढ आणि फुलांच्या दांड्यांच्या वाढ जोमाने होते. परंतु सद्या देशभर लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे मागणीही नाही अन् खपही होत नाही त्यामुळे ही फुलबाग शेतातच सडून जाण्याच्या मार्गावर आहे.
फुल शेतीमध्ये गुलछडी हे तीन वर्षे उत्पादन देणारे फुल आहे, यासाठी तसे कष्ट सुद्धा घ्यावे लागतात. सकाळी सूर्योदयापूर्वी फुले तोडावी लागतात. तर या उन्हाळ्याच्या दिवसात प्रति किलो 80 ते 120 रुपये इतका बाजार या फुलांना मिळतो व प्रति एकरी रोज फक्त 8 ते 12 किलो फुले मिळतात. मात्र सध्या फुल मार्केट बंद असल्याने ही फुले सर्वत्र शेतातच फुललेल्या अवस्थेत दिसत आहेत.
– मयूर यादव,
शेतकरी माळशिरस.