इस्लामपूर -इस्लामपूर शहराला निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडिअम हायपोक्लोराईडची गरज असल्याचे पत्र माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठवण्यात आले होते. त्यांनीही तातडीने 350 लीटर सोडियम हायपोक्लोराईडचे कॅन स्वतः इचलकरंजी येथून टेम्पोतून आणत इस्लामपूर नगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द केले.
इस्लामपूर शहरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने विशेष लक्ष देऊन युध्दपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज आहे. शासनाने जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर सर्वसामान्य नागरिकांना यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
राज्यात मुंबई व पुण्यानंतर सर्वाधिक करोना रूग्ण हे इस्लामपूर शहरात आहेत. येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होमक्वारंटाईन केल्यामुळे शहरात या केमिकलची फवारणी करणे गरजेचे आहे. सदर फवारणीमुळे सदरचा परिसर जवळपास 10 दिवस निर्जंतुकीकरण राहत असल्याचे सांगण्यात आले.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून मागणी केली. तसे पत्रही पाठविले.
राजू शेट्टी स्वत:च सोडियम हायपोक्लोराईड घेऊन नगरपालिकेत पोहचले. तसेच शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, भागवत जाधव, विकास कबुरे तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.