नवी दिल्ली – तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभासाठी देशभरातून कार्यकर्ते ज्या रेल्वेगाड्यांनी दिल्लीत पोहोचले होते, त्या रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांच्या माहिती संकलनासाठी आता रेल्वे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. दिल्लीवरून 13 मार्च ते 19 मार्च दरम्यान दिल्लीवरून निघणाऱ्या 5 रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची माहिती आता गोळा केली जाते आहे.
दिल्ली ते गुंटूर (आंध्रप्रदेश) दुरांतो एक्सप्रेस, चेन्नईला जाणारी ग्रॅन्ड ट्रंक एक्सप्रेस, चेन्नईला जाणारी तामिळनाडू एक्सप्रेस, नवी दिल्ली-रांची राजधानी एक्सप्रेस आणि एपी संपर्क क्रांती एक्सप्रेस या त्या 5 रेल्वेगाड्या आहेत. या रेल्वेगाड्यांमधील नेमके किती जण तबलिगी समारंभासाठी गेलेल्यांच्या संपर्कात आले होते, हे सांगता येऊ शकत नाही. यातील प्रत्येक रेल्वेमध्ये सुमारे 1 हजार ते 1,200 प्रवासी होते. याशिवाय रेल्वेचे कर्मचारीही होते. या सर्वांना तबलिगीच्या संसर्ग झालेल्यांकडून करोनाचा संसर्ग झाला असण्याची भीती आहे.
या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची यादी रेल्वेकडून राज्य सरकारांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातील तबलिगी जमातीच्या समारंभाला उपस्थित असलेल्यांची नावे शोधून काढून त्यांचा कोणा-कोणाशी संपर्क आला असावा, याची माहिती घेतली जात आहे. याशिवाय एपी संपर्क क्रांती एक्सप्रेसने करिमनगर जिल्ह्यात परतीच्या प्रवासात इंडोनेशियाच्या 10 जणांकडूनही प्रवाशांना करोनाचा संसर्ग झाला असू शकतो. त्यामुळे त्यांच्या डब्यातील प्रवाशांचीही माहिती गोळा केली जात आहे.