पिंपरी – संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी देवाची लगतच्या दहा गावांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, यामुळे आळंदीत लग्नाचा बार उडवून देण्यासाठी बुक केलेली नियोजित तारीख रद्द करावी लागल्याने उपवरांसह वधू व वर पित्याची मोठी गैरसोय झाली आहे. परिणामी डिसेंबरमधील काही मुहूर्तांवरदेखील पाणी सोडावे लागले आहे.
लग्नपंढरी अशी आळंदीची राज्यात ओळख आहे. अगदी हजार रुपयांपासून वधुपित्याला परवडेल, अशा कमी दरात याठिकाणी धुमधडाक्यात लग्न लावली जातात. त्यामुळे देवाच्या दारात लग्न करायाला अनेकजण प्राधान्य देतात. लग्नसराईच्या एका हंगामात हजारो वधू-वर याठिकाणी विवाहबद्ध होतात.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 4 डिसेंबरला आदेश काढत संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार आळंदी व लगतच्या गावांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. यामध्ये केळगाव, चऱ्होली खुर्द, चऱ्होली बुद्रुक, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ व डुडुळगाव या गावांचा समावेश आहे. येत्या सोमवारपर्यंत (दि. 14) ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यात 7, 8, 9, 17, 19, 23, 24 आणि 27 असे एकूण आठ मुहूर्त आहेत. यापैकी तीन मुहूर्त संचारबंदीच्या काळात आल्याने यादिवशी विवाह करता येणार नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चऱ्होली बुद्रुक व डुडुळगावात अनेक मंगल कार्यालये आहेत. आठ महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर 50 वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराईमध्ये आर्थिक उलाढाल होण्याची शक्यात असतानाच डिसेंबरमधील तीन मुहूर्त हातचे गेल्याने मंगल कार्यालय चालकांनादेखील याचा फटका बसला आहे.