बाजारपेठा थंडावल्या : जिल्ह्यात परिणाम
पारगाव शिंगवे – करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रमुख शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपापले उद्योग तसेच दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे बाजारपेठा थंडावल्या आहेत, त्याचा परिणाम शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनावर झाला आहे.
आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथीस संतोष फकिरा कुरकुटे या शेतकऱ्याच्या 50 गुंठे क्षेत्रातील विक्रीसाठी तयार झालेली कलिंगड ग्राहकांअभावी शेतात पडून आहेत. अजून चार ते पाच दिवस ही सुमारे 30 टन कलिंगडे तशीच पडून राहिल्यास खराब होऊन सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान
होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील जिरायती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहाडदरा येथील संतोष कुरकुटे यांनी विहिरीच्या पाण्यावर ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर करून 55 गुंठे क्षेत्रात मॅक्स वाणाची कलिंगडाच्या रोपांची लागवड केली. एकूण सहा हजार रोपांची लागवड करण्यात आली. एक रोप तीन रुपयाला पडले.
लागवडीनंतर 65 दिवसांनी कलिंगडे विक्रीसाठी तयार झाली आहेत. एकेका कलिंगडाचे वजन चार ते पाच किलोवर गेले आहे; परंतु देशात विशेष करून राज्यात करोना विषाणुंचा संसर्ग वाढू नये म्हणून मोठ मोठ्या शहराबरोबर अगदी ग्रामीण भागात सुद्धा सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. बाजारपेठा थंडावल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे.
कुरकुटे यांच्या शेतात कलिंगडे तयार होऊनही ग्राहक नसल्याने ती शेतात पडून आहेत. वातावरणात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हाने कलिंगडे खराब होऊ लागली असल्याने त्यांनी कलिंगडाला रद्दी कागद गुंडाळले आहेत. त्यांना कलिंगडाचे उत्पादन घेण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये भांडवली खर्च आला आहे.
दर चांगला तरीही मालास उठाव नाही
दोन आठवड्यांपूर्वी कलिंगडाच्या प्रती किलोला 15 ते 20 रुपये बाजारभाव होता. अजून चार ते पाच दिवस अशीच कलिंगडे शेतात पडून राहिल्यास ती खराब होणार आहेत. सुमारे 30 टन कलिंगडे तशीच पडून राहिल्यास कलिंगडे खराब होऊन सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान होणार आहे.