सातारा – गाळपासाठी येणाऱ्या उसाला सातत्याने एफआरपीनुसार दर देऊन अजिंक्यतारा कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास मिळवला आहे. सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकारणाऱ्या या कारखान्याच्या प्रगतीत कामगार व सभासद शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.
व्यवस्थापनाचे उत्कृष्ट नियोजन व काटकसरीमुळे कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे. अजिंक्यतारा कारखाना राज्यात आदर्श म्हणून गणला गेला आहे, असे गौरवोद्गार कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशानुसार कारखान्याची 2019-20 या आर्थिक वर्षाची सभा ऑनलाइन पद्धतीने रविवारी (दि. 14) झाली. त्यामध्ये ते बोलत होते. चेअरमन सर्जेराव सावंत अध्यक्षस्थानी होते.
कारखाना प्रगतिपथावर नेण्यास सिंहाचा वाटा असल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशनकडून कारखान्यास 2019-20 या वर्षाचा ऊस उत्पादकतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने शेंद्रे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालकांचे अभिनंदन केले.
प्रा. जयंवत नलावडे-वाढे यांनी वार्षिक सभेत अभिनंदनाचा ठराव पारित करण्याची सूचना केली. उपाध्यक्ष विश्वास शेडगे यांनी प्रास्ताविक केले. संजीव देसाई यांनी सभेची नोटीस व अहवालवाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सभासदांच्या प्रश्नांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उत्तरे दिली. मागील हंगामात कारखान्याचा साखर उतारा अत्युत्तम राहिल्याने 2020-21 च्या गाळप हंगामाकरिता कारखान्याची एफआरपी प्रति मेट्रिक टन 3043 रुपये निघाली आहे. ऊस उत्पादकांचे दर दहा दिवसांचे पेमेंट करणारा हा राज्यातील पहिला कारखाना आहे.
कारखान्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिस्टिलरी व इथेनॉल प्लॅंटचा लवकरच विस्तार करण्यात येईल, असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले. केंद्र शासनाच्या आयईएम विभागाकडून गाळप क्षमता प्रतिदिन 2500 मेट्रिक टनावरून 4500 मेट्रिक टन करण्यास परवानगी मिळाली आहे. साखर उत्पादनाचा वाढता खर्च विचारात घेता साखरेची किमान किंमत प्रतिक्विंटल 3400 ते 3500 रुपये वाढवून दिल्यास एफआरपीप्रमाणे पेमेंट अदा करण्यात अडचण येणार नाही. यासाठी राज्य व देशपातळीवरून प्रयत्न होणे आवश्यक आहे.
2019-20 या हंगामात शिल्लक असलेला साठा व चालू गळीत हंगामातील साखर उत्पादन विचारात घेता, या हंगामात रॉ शुगरचे उत्पादन घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या हंगामात आतापर्यंत 6,17,150 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, त्यामध्ये 3,01,810 क्विंटल रॉ शुगरचे उत्पादन घेऊन निर्यात करण्यात येत आहे.
आतापर्यंत 5,28,830 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून या उसाची प्रति मेट्रिक टन 2600 रुपयांप्रमाणे पहिल्या ऍडव्हान्स हप्त्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये वर्ग केली आहे. या हंगामात सात लक्ष मेट्रिक डटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले. संचालक नामदेव सावंत यांनी आभार मानले.