मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहत असतात. दरम्यन, त्यांनी पुन्हा एकदा सोलापुरात जोरदार फटकेबाजी केल्याचे समोर आले आहे. आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे. चकवा योग्य बसला तर अंगावर गुलाल पडतो. मात्र, चकवा हुकला तर पाच वर्षे घरी बसावं लागतं, हे आमचं दु:ख आहे, असं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. ते सोलापुरात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते.
यावेळी त्यांनी, “आज इथे समोर बघताना मला माझ्या कॉलेज जीवनाची आठवण झाली. इथे आज अवघा महाराष्ट्र गोळा झाला आहे. आता महाराष्ट्रात कुणीही मागे शिल्लक राहीलं नाही. ही तरुणाई पाहिल्यानंतर, मनात कधी कधी विचार येतो की, देवानं इतक्या लवकर मला म्हातारं का केलं? अजून तरुण असतो तर बरं झालं असतं.”असे म्हटले.
आपल्या महाविद्यालयीन जीवनातील किस्सा सांगताना शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, “मी कॉलेजला असताना तिथे ग्रामीण आणि शहरी भागातील मुलं मुली होते. तिथे सातारा सैनिक स्कूलमधून शिकून आलेल्या पोरांची वेगळीच फळी होती. ही पोरं सर्वच वर्गात असायची. हॉकी, फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे खेळ फक्त सैनिकी स्कूलमधून आलेली पोरंच खेळायची. आम्ही मात्र कबड्डी, खो-खोसारखे गावरान खेळ खेळायचो. सैनिकी स्कूलमधील मुलं बास्केटबॉल खेळताना आम्ही लांब उभं राहून त्यांना पाहायचो. ते बास्केटमध्ये बॉल कसं टाकतात, हे पाहून नवलाई वाटायची.”
त्या खेळाचं वैशिष्ट्ये त्यावेळी मला वाटलेलं, बास्केटबॉल खेळताना खेळाडू बॉलकडे बघतही नाहीत. ते दुसरीकडे बघत बॉल टॅप करतात आणि गोल करण्याचा प्रयत्न करतात. समोरच्या संघाला चकवा देतात. आम्हीही चकवा देत असतो. आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे. तुमचा चकवा योग्य बसला की बॉल वर जातो, आमचा चकवा बसला की गुलाल अंगावर पडतो. फरक एवढाच आहे की, तुमचा एक चकवा चुकला तर दुसऱ्या बाजुला चकवा टाकायला तुम्हाला संधी मिळते. पण आमचा एक चकवा चुकला की पाच वर्षे घरात बसावं लागतं, असं विधान शहाजी बापू पाटलांनी केलं आहे.