खरीप हंगाम वेग पकडणार ः बळीराजा सुखावला
केडगाव (वार्ताहर) – यंदाच्या पावसाळ्यात पावसाच्या दमदार सुरवातीमुळे बळीराजा सुखावला असून करोनाच्या महामारीतदेखील शेती कामांची लगबग दिसून येत आहे.
जून महिन्यात दरवर्षी पाऊस एवढ्या लवकर दाखल होत नाही. पावसाचे रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडेच जाते हा अनेक वर्षांपासूनचा शेतकऱ्यांना अनुभव आहे. इतकेच काय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळाही अनेक वेळा कोरडा गेला आहे; परंतु यंदाचा पावसाळा याला अपवाद ठरल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे. जून महिन्यातच दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. केडगावसह चौफुला, बोरीपार्धी, वाखारी, नानगाव, पारगाव, खुटबाव आणि इतरत्र प्रारंभीच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे चालु वर्षी पावसासाठी लोकांना जास्त वाट पाहावी लागली नाही.
करोनाचे संकट अवघ्या दौंड शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू असताना शेतकरी मात्र पावसाच्या आगमनाने समाधानी झाला आहे. करोना संकट तात्पुरते आहे, पाऊस होणे त्याच्या वर्षभराच्या प्रश्नाशी निगडीत बाब असल्याने शेती कामात शेतकरी आणि त्याचे कुटुंब गुंतले आहे. सध्या ऊस, बाजरी, मका पिकाच्या लागणीचा हंगाम आहे. त्यामुळे चालू शेतीचा हंगाम शेतकरी बांधवांसाठी चांगला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.