पवनानगर, दि. 18 (वार्ताहर)- दोन दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसाने मावळ तालुक्यातील रस्त्यांच्या वाट लावली आहे. आगोदर असलेल्या खडड्यांच्या संख्येत वाढ झाली असून, पवन, आंदर व नाणे मावळातील नागरिकांबरोबरच याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय वाहने नादुरूस्त होण्याचे प्रमाणही वाढल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहे.
कामशेत-पवनानगर रस्त्यावर पवनानगर परिसरात येण्यासाठी मुख्य रस्ता असलेल्या कामशेत पवनानगर रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या भागातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार व परिसरात येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. लोणावळ्याहून दुधिवरे खिंडमार्गे येणाऱ्या मध्य मार्गावरील रस्त्याची तर दयनीय अवस्था झाली आहे. दोन्ही बाजुकडुन येणाऱ्या रस्त्यावर खड्डे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत
पवनानगर-खंडाळ्यानंतर पर्यटकांच्या सर्वात पसंतीचे दुसरे आवडते पर्यटन केंद्र म्हणजे पवनाधरण परिसर होय. तसेच लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोणा हे गडकिल्ले, प्राचीन बौद्धकालीन लेण्या, विस्तीर्ण पवना व मळवंडीठुले हि जलाशये, पावसाळ्यात हिरवाईने नटलेले पवनेचे खोरे आणि येथील उंच डोंगर दऱ्यांतून कोसळणारे धबधबे हे पर्यटकांना मोहिनी घालत आहे. दुधिवरे येथील प्रतिपंढरपूर, पवना जलाशयातील बोटिंग क्लबचे पर्यटकांमध्ये आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान या रस्त्यावरील खड्डयांमुळे आता स्थानिकांकडून दुधिवरे खिंडमार्गे जाण्याऐवजी अन्य पर्यायी मार्गांचा वापरकरत आहेत.
कान्हे : आंदर मावळ भागातील सुमारे 50-55 गावे, वाड्या-वस्त्यांना मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या तसेच औद्योगिक वसाहतींना दळणवळणासाठी उपलब्ध कान्हे फाटा येथील एकमेव मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज ये-जा करणारे कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी व नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पावसाचे वातावरण असल्याने आंदर मावळ भागातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी देखील वाढलेली दिसत आहे. अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढली असून अपघाताचा धोका व प्रमाण वाढले आहे.
कामशेत : सुमारे 60 ते 70 गावे आणि वाड्या-वस्त्या मिळून नाणे मावळ परिसर मानला जातो. याठिकाणी पर्यटकांचे आकर्षण असलेले कोंडेश्वर, शिरोदा ,उकसान जवळील निसर्गरम्य परिसर अशा विविधतेने नटलेला परिसर जांभवलीपासून ते कामशेत, खांडशी ही ठिकाणे कायम पर्यटकांना कायम आकर्षित करतात.
या भागातील रस्त्यांची चाळण झाली असून,रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे.जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.प्रसंगी छोटे छोटे अपघात होत आहेत.मात्र एखाद्या वेळी मोठी दुर्घटना होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकता, याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.