ग्रामस्थांच्या एकीचे यश : तीन वर्षांपासून भूजल पातळी दुपटीने वाढल्याचा दावा
माळेगाव -नीरा नदीच्या तीरावर बारामतीपासून 20 किलोमीटरवर असणरी खटकेवस्तीला 2016पर्यंत दुष्काळे ग्रासले होते. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत वनविभागाच्य सहकार्यातून देवराई प्रकल्प यशस्वी केला अन् तेव्हा पासून आजपर्यंत गावात बारामाही पाणी खळखळत असल्याने ग्रामस्थांना दुष्काळाची कसली चिंता नाही. तर गावात पाणी पातळीत वाढ झाल्याचा दावाही नागरिकांनी केला आहे.
नीरा नदीतून बेसुमार वाळू उपसा झाल्यामुळे बारामाही तुडुंब भरलेल्या विहिरी काही वर्षांपूर्वी आटू लागल्या. पिक पद्धती बदलू लागली. त्यामुळे नागरिकांना जाग आली अन् दुष्काळ पडू नये यासाठी दूरगामी निर्णय घेतले गेले. यासाठी निसर्ग जागर प्रतिष्ठान व वनविभागाच्या सहकार्याने गावातील वनविभागाच्या ओसाड जमिनीवर देवराई उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. 2016 मध्ये वनविभागाच्या 50 फूट उंचीवरील टेकडीच्या माथा ते पायथ्यापर्यत 12 एकर क्षेत्रावर 1500 स्थानिक मिश्र झाडांची लागवड केली.
देवराईमधील वहिवाट ग्रामस्थांनी एकी करून बंद केली. देवराई भागातील गेली तीन वर्षापासून कुऱ्हाड व चराईबंदी कायम केली आणि झाडांना लोकसहभागातून ठिंबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यात येते. देवराई प्रकल्पात पक्षांचा रहिवास वाढला आहे. फुलपाखरे दिसू लागली आहे. मूळ आदीवास कायम राहण्यासाठी मदत झाली. या क्षेत्रात खैर, करंज, लिंब, चिंच, जांभूळ, खुरटी झुडपी, बाभूळ, अशी जवळपास 27 पेक्षा अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र तब्बल तीन वर्षांनी पाण्याची भूजल पातळी दुपट्टीने वाढली असल्याचे डॉ. विकास खटके यांनी सांगितले आहे.
तीन वर्षानंतर परिणाम
– पाणीपातळीत वाढ (फेब्रुवारी नंतर कोरड्या पडणाऱ्या विहीरत पाणी)
– वृक्षांची कृत्रिम पाण्याची गरज थांबली
– पक्ष्यात झालेली वाढ, उन्हाळ्यातही फुलपाखरे दिसू लागली.
नागरिकांची एकीने घेतला निर्णय
– कुऱ्हाड बंदी, चराई बंदी
– समतलचर खोदाई
– पावसाळ्यानंतर वृक्ष लागवड
– वृक्ष जगवण्याचे नियोजन
– मातीची धूप थांबविणे
– वनक्षेत्र परिसर – 12 एकर लागवड
– वृक्ष लागवडीपैकी वृक्ष – 1500
– सार्वजनिक वहिवाट बंद, पर्यायी मार्ग बंद
राखीव गवतामुळे जमिनीची धूप थांबते, झाडांसाठी पोषक वातावरण निर्माण होते. झाडांना पाणी कमी लागते. राखीव क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पाणी पातळीत वाढ होते.
– महेश गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ
नीरा नदी जवळ असूनही ग्रामस्थांना तीन वर्षांपूर्वीच पाणी टंचाई जाणू लागली होती. लोकसहभागातून पर्यावरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला; मात्र आज त्याचे फायदे दिसू लागले आहे.
– सविता खटके, माजी सरपंच, खटकेवाडी