नगर, (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभे आयुष्य दिन दलित, उपेक्षित, वंचित वर्गासाठी घालवले. या वर्गासाठी बाबासाहेबांनी जे कार्य केले ते तर सर्वानाच माहीत आहे. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला.
शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. डॉ. आंबेडकर यांचे मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणे, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा विकास करणे, हे डॉ.बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन श्री विशाल देवस्थानेचे सचिव अशोकराव कानडे यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, पांडूरंग नन्नवरे, बापूसाहेब एकाडे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, गजानन ससाणे, प्रा.माणिक विधाते, राजेंद्र एकाडे, गणेश राऊत आदि उपस्थित होते.