पुणे -करोनामुळे बंद करण्यात आलेली महाविद्यालये दि.1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा दि.15 फेब्रुवारीनंतर सुरू होणार आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू झाली तरी पंधरा दिवसांसाठी विद्यार्थी येतील? या विषयी सांशकता व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाने स्थानिक प्रशासनालाच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी आहे. तसेच, लसीचे दोन डोस न झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दि.1 फेब्रुवारीपासून संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यातच महाविद्यालये दि.1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, दि.15 फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होतील. त्याप्रमाणे पहिल्या सत्राचा सर्व अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला आहे. अशा स्थितीत केवळ 15 दिवसांसाठी विद्यार्थी महाविद्यालयात येणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.