नवी दिल्ली – बिहार मधील राजकीय पक्षांनी महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या उमेदवारांना या निवडणुकीत उमेदवारी देऊ नये असे आवाहन निर्भया ज्योती ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
दिल्लीत 2012 साली झालेल्या निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणाच्या घटनेनंतर संबंधीत मुलीच्या कुटुंबियांकडून हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी मतपेढीचे राजकारण न करता स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी असे आवाहनही या ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
राजकीय पक्षांनी ही प्रथा पाळली तरच समाजात महिलांचा सन्मान करण्याचा विचार जोर धरू शकेल आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना राजकीय प्रतिष्ठ मिळणार असेल तर लोकांचा या सिस्टीमवरचाच विश्वास उडून जाईल असेही त्यांचे म्हणणे आहे.
या ट्रस्ट तर्फे जे निवेदन जारी करण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की हाथरस घटनेतील पीडित मुलीच्या घरी जाऊन सर्वच राजकीय पक्षांची नेतेमंडळी या कुटुंबियांविषयी आपली सहानुभुती दर्शवत आहेत. पण या सर्वच राजकीय पक्षांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आमदार, खासदार बनवून लोकशाहीच्या पवित्र मंदिरात बसवण्याचा प्रयत्न करता कामा नये.