मुंबई – देशात पुन्हा एकदा करोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने बीसीसीआयने सर्व वयोगटातील तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्या आहेत. या निर्णयामुळे विनू मांकड चषक स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच आयपीएलनंतर परिस्थितीचा आढावा घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.
बीसीसीआयने राज्यांमधील क्रिकेट मंडळांना पत्र लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे. स्पर्धेसाठी वेगवेगळ्या शहरांमधील प्रवास आणि बायो बबलसारख्या गोष्टींची आवश्यकता या स्पर्धांमध्ये भासत असल्याने सध्या त्या स्थगित करणअयाचा निर्णय घेण्यात आला.
बीसीसीआयच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल लिलावाआधी सय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेपासून घरगुती क्रिकेट स्पर्धांना पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विजय हजारे चषक ही देशांतर्गत टी-20 मालिका यशस्वीपणे खेळवण्यात आली.
सध्या महिलांच्या वरीष्ठ गटातील एकदिवसीय सामन्यांची मालिका देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवली जात असून अंतिम सामना चार एप्रिल रोजी होणार आहे.
या मोसमात वेगवेगळ्या वयोगटातील जास्तीत जास्त घरगुती सामने खेळवण्याचा आमचा प्रयत्न असला तरी सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला सर्वच वयोगटातील क्रिकेट मालिका स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही बीसीसीआयने सांगितले आहे.