पावसाळ्यात सर्वाधिक त्रास म्हणजे कपडे पावसाने ओले झाल्यानंतर सुकवण्याचा. कारण पावसाळ्यात वातावरण दमट असल्यामुळे आणि सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ होत असल्यामुळे दोन-तीन दिवस कपडे सुकतच नाहीत.
ओले कपडे लवकर न वाळल्यामुळे काहीवेळाने त्यांना कुबट वास येतो. पावसात कपडे ओले झाल्यानंतर अनेक जण ओले कपडे वॉशींग मशीनमध्ये टाकतात. मशीन जर एकदोन दिवसाआड सुरू केली तर मशीनमधील कपडे ओलेच राहतात. त्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो. त्यामुळे ओले कपडे अगोदर पंख्याखाली वाळवा. त्यानंतरच धुवायला टाका.
पावसाळ्यात डिटर्जंट पावडरमध्ये थोडासा बेकिंग सोडा घाला. यामुळे कपड्यांचा वास तर जाईलच पण त्याशिवय कपडे अधिक स्वच्छ आणि निर्जंतुक होईल. पावसाच्या दिवसांत सूर्यप्रकाश कितीवेळ असेल याचा काहीच भरवसा नाही.
त्यामुळे ऊन येण्याची वाट पाहत बसू नका. पावसात भिजलेले कपडे सुकवण्यासाठी पंख्याखाली वाळत घाला. पाऊस उघडल्यानंतर घराची दारं-खिडक्या उघडा जेणेकरून घरात हवा खेळती राहून कपडे लवकर सुकतील.
लहान मुलांची कपडे वेगळी ठेवा. कारण मोठ्या माणसांची कपडे जाडेभरडे आणि मोठे असल्याने सुकण्यास अधिक वेळ लागतो. मात्र लहान मुलांचे कपडे छोटे असल्याने ते तुलनेने लवकर सुकतात. त्यामुळे लहान मुलांची कपडे वेगळे धुवा आणि सुकायला टाका.