गलांडवाडी नं.१ येथे पावसाने उघडीप दिल्यामुळे शिवार गजबजले
रेडा – इंदापूर तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे तरकारी पालेभाजाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे दोडका उत्पादक शेतकऱ्यांनी वेल बांधणीला सुरूवात केली आहे.
दोडका विक्रीसाठी आणि अगोदर मोठा खर्च आहे. यामध्ये एकरी स्टेजिंग करण्याकरिता एक ते सव्वा लाखापर्यंत खर्च आला आहे. मल्चिंग पेपर बॅड निर्माण करण्यासाठी पन्नास हजारांवर खर्च येतो. हा दोडका सव्वा महिन्याने तोडण्याजोगा झाल्यानंतर बाजारभाव चांगला मिळाला तर हक्काचा पैसा उपलब्ध होईल. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे मजूर ग्रामीण भागात मिळत नाहीत. नाहीतर तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे मजुरांना वाढीव पगार देऊन वेल बांधण्यासाठी सुरुवात केली आहे.
टोमॅटो, इतर फळभाज्याचे देखील स्टेजिंगचे काम सुरू आहे. निमगाव केतकी, वरकुटे खुर्द, काटी, भोंडणी, शेटफळ हवेली परिसरात या कामांची लगबग सुरू आहे.पालेभाजी व फळबागांवर औषध फवारणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च वाढत आहे. परतीच्या पावसाने झालेले नुकसान डोळ्यासमोर असताना दुसरीकडे खर्च करताना हात आखडता घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गोची झाली आहे.
आम्हाला पाच एकर जमीन आहे. मात्र, यात आम्ही तरकारी पिक घेत असतो. मात्र, पाण्याची टंचाई जाणवल्यामुळे यातून हाती काही न पडता नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अवर्षण प्रवण क्षेत्र असल्यासारखे आमच्या भागाला कीड लागली होती. मात्र, यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आम्ही तरकारी पिकांचे उत्पादन घेतले. मात्र, पावसामुळे पिक भुईसपाट झाली आहेत. आमची शेती माळरानावर असल्यामुळे पावसाचे पाणी बहुतेक निचरा झाला आहे. त्यामुळेच एक एकर दोडका लागवड केलेल्या क्षेत्रांमध्ये दोडका वेल बांधणे मजुरांकडून सुरू केले आहे.
-महेश शिंगटे, शेतकरी, गलांडवाडी नंबर एक.