देवानंतर अनेकांची निष्ठा ही डॉक्टरांवर असते कारण ते अनेकदा जीवदान देणारे ठरतात. तसेच त्यांच्यात “धन्वंतरी’चे रूप अनेकजण पाहात असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे “डॉक्टर्स डे’. पुण्यात अनेक निष्णात तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यापैकी डॉ. राम धोंगडे यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. डॉ. धोंगडे हे बालरोग तज्ज्ञ आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे “शैशव चिल्ड्रन्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रा. लि.’ नावाने मुलांचे हॉस्पिटल आहे. डॉ. राम यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी डॉ. आशालता, मुलगा डॉ. आशिष आणि स्नुषा डॉ. मयुरी देखील वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक योद्धे म्हणूनच जोमाने कार्यरत आहेत.
समाजात डॉक्टरांचा सन्मान होतो. त्यांच्याविषयी समाजात आदर आहे. मात्र यावेळचा “डॉक्टर डे’ हा करोनाच्या पार्श्वभूमीवर काहीसा वेगळा आहे. अनेक डॉक्टर “करोना वॉरियर’ म्हणून काम करत आहेत. समाजाची सेवा करण्याची ही अतिशय चांगली संधी आहे. अनेकांचे प्राण या काळात डॉक्टरांच्या उपचारांमुळे आणि वैद्यकीय सेवेमुळे वाचले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बोलायचे झाले, तर यावर अद्याप ठोस मात्रा मिळाली नाही. मात्र, रुग्णसेवा करणे हा डॉक्टरांचा धर्म आहे, असे डॉ. धोंगडे म्हणतात.
त्याचे उदाहरण देताना त्यांनी डॉ. बाबा आमटे यांचे दिले. आनंदवनसारख्या दुर्गम ठिकाणी कुष्ठरोग्यांची सेवा डॉ. बाबा आमटेंनी केले. वास्तविक कुष्ठरोग हा संसर्गाने पसरतो. तरीही त्या रुग्णांची त्यांनी न डगमगता सेवा केली. त्यामानाने करोना बाधितांची सेवा करणे फार धोक्याचे नाही. सुरक्षेची संपूर्णपणे काळजी घेऊन ते केले पाहिजे, असे डॉ. धोंगडे सांगतात.
आजच्या पिढीला एक संदेश देणे महत्त्वाचे वाटते. तुम्ही कोणत्याही गावातून, कोणत्याही सामाजिक स्तरातून आलेले असाल; परंतु तुम्हांला ज्ञान असेल आणि तुम्ही चिकाटीने काम केले असेल तर तुम्हांला यश नक्कीच मिळेल. वैद्यकीय क्षेत्रातील सध्याची नवी पिढी ही अनेक संस्थांतर्फे आयोजित शिबिरांमध्ये सहभागी होते, काहीजण लेक्चर्समध्ये आपला सहभाग दर्शवतात आणि सन्मान मिळवतात, असेही डॉ. धोंगडे नमूद करतात.डॉक्टरांचा
रिझर्व फोर्स हवा
आज करोनासारखी परिस्थिती पाहिली असता पोलिसांप्रमाणे डॉक्टरांचाही रिझर्व फोर्स सरकारने ठेवला पाहिजे, असे मला वाटते. अशी काही सरकारला गरज पडली, तर डॉक्टरांनी त्वरित या सेवेत आले पाहिजे, असा करारही सरकारने केला पाहिजे. तसेच सरकारी दवाखन्यात “रेसिडेन्ट डॉक्टर’ च्या पोस्ट वाढवणे गरजेचे आहे. त्यातून रोगांवर लढणारे सैनिक तयार होतील. सरकारी शिवाय खासगी ठिकाणीही असे करार केले पाहिजेत, असे मत डॉ. धोंगडे व्यक्त करतात.
सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर वाढवल्यास त्यांना वैद्यकीय सेवेसाठी “पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्ट’ पण मिळतील. हल्ली सरकारी नोकरीत अनेकांना यायचे आहे. काही वर्षे शिक्षकी पेशामध्ये काम करण्याचीही अनेकांची इच्छा आहे. जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा नव्या पिढीला उपयोग होईल, असे डॉ. धोंगडे म्हणाले.
मूलभूत सोयी सुविधांचा विचार करताना तालुका पातळीवरील दवाखाने जर चांगल्याप्रकारे विकसित केले तर, या परिसरातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज पडणार नाही, असेही मत डॉ. धोंगडे व्यक्त करतात.