पुणे – “लोकमान्य टिळक’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका व्यासपीठावर होते. त्याचवेळी शहरात कॉंग्रेस पक्षाच्या सुरात सूर मिसळत राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात आंदोलन केले. तर,” पवार साहेबांनीच मोंदीना फोन करून कार्यक्रमाचे आमंत्रण दिले,’ असे सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगत आहेत. पण, व्यासपीठावर पवार यांच्याशी न बोलताच अजित पवार निघून गेले. यातून सामान्य पुणेकरांसह पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची अवस्था मात्र या कार्यक्रमानंतर काही समजेना, काही उमजेना..अशी झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांनी भाजपाशी हात मिळवणी करीत “वेळ’ साधली. पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावरच अजित पवार यांनी अधिकार सांगितल्याने यामागे मोदींच्या भाजपची राजकीय चाल असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती. आपण भाजपच्या जवळ कधीही जाणार नाही, अशी राजकीय भूमिकाही पवार यांनी मांडली होती. त्यानंतरही “अराजकीय’ कार्यक्रम असल्याने शरद पवार हे नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावर, अन्य काही पक्ष, संघटनांनी मात्र पवार यांच्या भूमिकेवर जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे.
‘इंडिया’तील सहभागाबाबत…
शरद पवार यांची आजची राजकीय भूमिका पाहता ते “इंडिया’ या राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या आघाडीमध्ये सहभागी आहेत, या आघाडीचा भाजप आणि मोदींविरुद्धचा संघर्ष टोकाला जात आहे. त्यातच पवार यांच्या पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. यातीला नेमका कोणता गट “राष्ट्रवादी’ असा प्रश्न असताना विरोधकांच्या “इंडिया’मध्ये असलेले शरद पवार, मोदी यांच्या कार्यक्रमाला गेल्याने पवार खरंच “इंडिया’त सहभागी आहेत का? असा प्रश्न या कार्यक्रमानंतर राष्ट्रपातळीवरही विचारला जात आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबतच्या दाव्याची न्यायालयीन लढाई ते आक्रमकपणे लढत नाहीत. बंडखोर आमदार त्यांची भेट घेण्यासाठी “सिल्व्हर ओक’वर जातात. यामुळे पवारांबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
मैत्रीतील लवचिकता
शरद पवार यांच्या पंचाहत्तरीच्या सोहळ्याला पंतप्रधान मोदी दिल्ली येथे उपस्थित राहिले होते. “पवारांचे बोट धरुन आपण राजकारणात आलो’, असे मोदी यांनी जाहीरपणे केलेले विधान तसेच बारामतीत झालेल्या सभेत टीकेऐवजी मोदी यांनी तेथील विकासाच्या मॉडेलचे केलेले कौतूक सर्वांच्या लक्षात आहे. याशिवाय पवार हे विविध प्रश्नांवर दिल्लीत सातत्याने मोदी यांना भेटत असतात. मोदी यांनीही राजकीय असो किंवा अराजकीय शरद पवार यांच्याबरोबर संबंध जपले आहेत. त्यामुळे “पुरस्कार’ कार्यक्रमात शरद पवार मोदींसोबत एका व्यासपीठावर कसे? यात आश्चर्य वाटणारेही काही नाही, असे बोलले जात आहे.