भवानीनगर-श्री छत्रपती साखर कारखान्याने राज्यात विक्रमी दराने मळी विकली आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्यात मळीच्या विक्रीवरून सभासदांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. पराचा कावळा करण्याने जर आपले म्हणणे खरे होते, असे कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे, असा पलटवार श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केला आहे.
पाठीमागच्या काळात मळीच्या विक्रीमध्ये नुकसान झाल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र त्या काळातही कोणतेही नुकसान झालेले नसून त्या काळात विम्याची भरपाई मिळालेली आहे. मळीचे दर वाढणार आहेत असे सांगितले जाते. मात्र सन 2004-05 मध्येही असेच साखरेचे दर वाढणार आहेत असे सांगितल्यानंतर संचालक मंडळाने विश्वास ठेवला आणि नंतरच्या काळात साखर अर्ध्या किंमतीने विकावी लागली त्याचे आकडे आजही उपलब्ध आहेत.
कारखान्यातील ऐछिक ठेवी बाबत आरोप करणाऱ्यांनी वस्तुस्थितीचाही विचार करावा. कारखान्याने विस्तारवाढ व सहवीजनिर्मिती करताना कर्ज घेतलेले आहे. शेजारील व राज्यातील इतरही कारखान्यांनी ज्या ज्या वेळी नुतनीकरण व विस्तारवाढी केल्या त्यांनाही त्या काळात अडचणी आल्याच होत्या. आम्हीही या अडचणीतून बाहेर पडू, तो विश्वास आम्हा संचालक मंडळाला आहे. फक्त आरोप करण्याने कारखान्यावर प्रेम आहे असे दिसत नाही. ज्यांचे कारखाना किंवा संस्थेविषयी प्रेम असते ते अशा प्रकारे संस्थेची बदनामी करीत फिरत नाहीत.
कामगारांचे थकीत पगार ही संस्थेची अडचण असली तरी येत्या काळात परिस्थिती स्थिर स्थावर होईल. नैसर्गिक आपत्तीचाही परिणाम होत असतो. छत्रपती कारखान्यातच नव्हे तर राज्यभरात अनेक कारखान्यांवर यावर्षी तोडणी यंत्रणा अपुरी आली, त्यामुळे दुसरे युनिट सुरू करण्याबाबत अडचणी आल्या, याची कल्पना कार्यक्षेत्रातील सभासदांना आहे. आम्ही रात्रंदिवस काम प्रामाणिकपणे करतो फक्त ते दाखवत नाही. आदरणीय चंद्रराव तावरे यांच्यावरच नाही तर कोणत्याही ज्येष्ठ व्यक्ती किंवा कोणत्याही वडीलधाऱ्यांचा आम्ही अवमान केलेला नाही. माळेगावच्या परिसरात जे सांगितले जात आहे, त्यासाठी फक्त तिथली निवडणूक छत्रपती कारखान्याची नाही, ती माळेगाव कारखान्याची आहे हेच सांगण्याचा मी प्रयत्न केला. यात मुद्दाम ज्येष्ठ व्यक्तींना आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप विरोधकांवर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केला आहे.