पुण, दि. 29 -राज्यातील मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसह, महापालिका निवडणूक तारखांचा फटका ऐन दिवाळीत फुटणार आहे. प्रभाग रचना, ओबीसी आरक्षणाव्यतिरिक्त होणाऱ्या 92 नगरपरिषदा यांच्या निवडणुका, राज्य सरकारने केलेले कायद्यातील बदल याबाबत दाखल झालेल्या सर्व याचिका एकत्र करून त्याची सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर महापालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे चित्र ऐन दिवाळीत स्पष्ट होणार आहे.
आधी करोना संकट आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यात पुण्यासह मुंबई, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नवी मुंबई, नाशिक अशा प्रमुख महापालिकांचाही समावेश आहे. राज्यात सत्ताबदल होताच ओबीसी आरक्षणास न्यायालयाची मान्यता मिळाली. मात्र, सत्तेत आलेल्या नव्या सरकारने तीनची प्रभाग रचना रद्द केली. त्यामुळे निवडणुकांचा तिढा आणखीनच वाढला असून, याबाबत पुणे, मुंबईसह राज्यभरातून याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.