प्रशांत जाधव
सातारा -करोनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना सातारा जिल्हा कारागृहात आणून ठेवल्याने तेथे करोनाचा फैलाव झाला आहे. जिल्हा कारागृहातील एक-दोन नव्हे तर नऊ कैदी करोनाबाधित झाल्याने इतर कैद्यांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. कारागृह प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे ही आपत्ती ओढवल्याचा आरोप केला जात आहे. एक हजाराहून अधिक करोनाबाधित सापडलेल्या पुण्यातील कारागृहात असलेल्या कच्च्या कैद्यांना साताऱ्यात आणून कारागृह प्रशासनाने कैद्यांच्या जिवाशी खेळ चालवला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कारागृहातील कैद्यांच्या नातोवाइकांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा कारागृहाची क्षमता 159 कैद्यांची असतानाही कधी तीनशे तर कधी चारशे कैदी ठेवल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. संख्या वाढल्याने कैद्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येथे. कैद्यांनी काही वेळा केलेल्या उपोषणांमुळे समोर आले होते. कधी जेवण धड नाही तर कधी अन्य सुविधांची वानवा, कैद्यांचे एकमेकांवरील जीवघेणे हल्ले या करागृहातील भानगडी अनेकदा समोर आल्या होत्या. हे सगळे कमी होते म्हणून की काय, कारागृह प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी मनमानी आदेश देऊन पुण्यातील कैदी सातारा जिल्हा कारागृहात धाडल्याने आधीच भयावह झालेले करोनाचे जिल्ह्यावरील संकट अधिक गडद झाले आहे.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह करोनामुळे लॉकडाउन केल्याने त्या कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय झाला आहे. हे खरे असेल तर तेथे नव्याने येणाऱ्या कैद्यांना इतरत्र ठेवण्याची जबाबदारी तेथील कारागृह प्रशासनाची नाही का? पुण्यात व्यवस्था होत नसल्यास अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात नवीन कैदी न पाठवता साताऱ्यालाच का पाठवले? यावरून कारागृह प्रशासन कैद्यांच्या व सातारकरांच्या जिवाशी खेळ करत नाही ना, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.
आधीच क्षमतेपेक्षा अधिक कैदी असलेल्या सातारा जिल्हा कारागृहात पुण्यातून कैद्यांना स्थलांतरीत करायचा निर्णय घ्याला नको होता; परंतु तसा निर्णय झाल्यावर त्यांची करोनाची चाचणी करणे आणि त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करणे, जिल्हा कारागृह प्रशासनाला महत्त्वाचे वाटले नाही का? त्या कैद्यांचे कारागृहातच विलगीकरण केल्याचे जिल्हा कारागृह प्रशासन भासवत असले तरी तेथे स्वतंत्र जागा व अन्य व्यवस्था आहे का, या प्रश्नांची उत्तरे भविष्यात कारागृह प्रशासनाला द्यावी लागतील; पण सध्या कारागृहातील इतर कैद्यांचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. शेवटी जिवावर आल्यावर कोणीच शांत बसणार नाही, मग तो कैदी असो की तुरुंगाधिकारी.
इतनी शक्ती हमे देना दाता
कारागृहातील कैद्यांना सध्या करोनाची धास्ती आहे. कारागृह प्रशासनावर त्यांचा विश्वास नाही. त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. करोनापासून बचावासाठी कैद्यांनी देवावरच भरवसा ठेवला असून “इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना’, अशी प्रार्थना ते करत आहेत, असे एका कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
कैद्यांचे काही बरेवाईट झाले तर…?
जिल्हा कारागृहातील कच्च्या कैद्यांची संख्या तीनशेच्या आसपास आहे. कारागृहाची क्षमता केवळ 159 कैद्यांची असल्याने सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाणार, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी कारागृह प्रशासनाकडे नाही. त्यामुळे या कैद्यांचे काही बरेवाईट झाले तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.