सातारा – जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 44 प्रवाशांवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून सर्वांची प्रकृती उत्तम आहे. एका प्रवाशास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप आला नाही. अद्यापपर्यंत करोनाबाधित एकही रुग्ण नसून नागरिकांनी भीती बाळगू नये.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन अलर्ट असून जिल्ह्यात दोन क्वारन्टाइन केंद्रात 50 बेड आणि सहा आयसोलेशन केंद्रांत 18 बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, कृषी सभापती मंगेश धुमाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी यावेळी उपस्थित होते. करोना विषाणू साधारणत: हवेवाटे खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरत असल्याचे पुढे आले आहे.
नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवून आरोग्य विभागाचे कर्मचारी सांगत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत करोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. करोनामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
जिल्हा परिषदेच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या 44 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृतीची वारंवार माहिती घेतली जात आहे. एका प्रवाशाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काही प्रवाशांवर होम क्वारन्टाइनमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका व्यक्तीवर क्वारंन्टाइनमध्ये उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण सापडलेला नसून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन कबुले व विधाते यांनी केले.