चंदीगड – पंजाब काँग्रेसमध्ये मंगळवारी आणखी एक भूकंप झाला. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहीत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या पत्रामध्ये सिद्धू यांनी आपण ‘तडजोड’ करू शकत नाही असं म्हंटलं आहे. काँग्रेसने नुकताच, पक्षांतर्गत कलहामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
सिद्धू व अमरिंदर सिंग यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर काँग्रेसने हे पाऊल उचलले होते. अमरिंदर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असली तरी त्यांच्याजागी सिद्धू यांना स्थान देण्यात आले नव्हते. यामुळे सिद्धू नाराज असल्याचा चर्चा होत्या.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेत असताना पक्षातील ४० आमदारांनी सुनील जख्खर यांच्या नावास, २० आमदारांनी रंधावा यांच्या नावास तर १२ आमदारांनी सिद्धू यांच्या नावास पसंती दर्शवली होती. अशात पक्ष नेतृत्वाने चरणजित सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सिद्धू यांना अपेक्षा होती की पक्ष नेतृत्वाने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे घोषित करावे.
काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी सिद्धू हे पुढील निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं सांगितलं होत. मात्र नंतर त्यांनी या वक्तव्यावरून माघार घेतली. सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रियंका गांधी त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करणार असल्याचं समजते. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी, ‘सिद्धू यांना आपल्याबाबत काही नाराजगी असल्यास त्यांच्याशी चर्चा करून ती दूर करू’ अशी प्रतिक्रिया दिली.
सिद्धू यांच्या नाराजीची ६ कारणे
१. नवज्योतसिंग सिद्धूच्या विरोधाला न जुमानता राणा गुरजीत सिंग यांना मंत्री बनवणे
२. सुखजिंदर रंधावा यांना गृह खातं देणे
३. एपीएस देओल यांची महाधिवक्ता म्हणून नेमणुक
४. कुलजित नागरा यांचा मंत्रिमंडळात समावेश न करणे
५. मंत्रिमंडळ निर्मिती व खातेवाटपामध्ये सिद्धू यांचे मत घेतलं न जाणं
६. मुख्यमंत्री न केल्याबद्दल नाराजी