कोलकता – पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी पक्षाच्या प्रदेश शाखेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बंगाल भाजपमधील असंतोष वाढीस लागल्याचे सूचित होत आहे.
वर्षभरापूर्वी झालेली विधानसभा निवडणूक जिंकत तृणमूल कॉंग्रेसने सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता काबीज केली. त्या राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगल्यानंतर भाजपच्या बंगाल शाखेतील धुसफूस वाढली आहे. अशात सिंह यांनी बंगाल भाजपच्या कार्यपद्धतीविषयी जाहीरपणे टीकाटिप्पणी केली.
त्यामुळे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने सिंह यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी त्यांना दिल्लीला पाचारण केले. त्यानुसार, सिंह यांनी सोमवारी नड्डा यांची भेट घेतली. त्या भेटीत बंगाल भाजपमधील स्थिती मी सांगितली. आता पुढे काय करायचे याविषयीचा चेंडू पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कोर्टात गेला आहे, असे सिंह मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या संपर्कात नसलेल्या आणि केवळ सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेत्यांना बंगाल भाजपमध्ये महत्व मिळत असल्याची नाराजी त्यांनी याआधी बोलून दाखवली होती.