सातारा – समाजातील महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस दलातील निर्भया पथकांना शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. समाज निर्भयपणे जगला पाहिजे; पण त्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना त्यांच्या कामासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने निर्भया पथकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. निर्भया पथकांना बळ देण्यासाठी शासनाने खास निधीची तरतूद करण्याची गरज आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी आणि संकटकाळात त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून जिल्हा पोलीस दलाने निर्भया पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांसाठी स्वतंत्र वाहने आणि वाहनचालक, पोलीस अधिकारी व कर्मचारीही महिलाच आहेत.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड होते. त्यातून पुढे शारीरिक शोषणाचे गंभीर गुन्हे घडतात. अन्य सार्वजनिक ठिकाणी, प्रवासातही विद्यार्थिनी, तरुणी व महिलांना छेडछाडीचे, लगट करण्याचे अनुभव येतात. नोकरी, कामाच्या ठिकाणीही लैंगिक शोषण व विकृत नजरांना सामोरे जावे लागते. घरगुती वादातून महिलांवरील होणारे अत्याचार वाढत आहेत. संकटात सापडलेल्या महिलांना तातडीने मदत मिळावी, त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून निर्भया पथके कार्यरत आहेत.
या पथकांसाठी स्वतंत्र वाहने आहेत. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी ही पथक सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत गस्त घालतात. जिल्हा पोलीस दलाच्यातीने नुकतीच सातारा शहरात “निर्भया रॅली’ही काढण्यात आली होती. त्यात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
कराटे क्लास चालवणाऱ्या युवतींनी कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता उपस्थित विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले होते. मात्र, महिलांना निर्भय करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही निर्भयपणे काम करता यावे, जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालयांच्या पसिरात पथनाट्ये, कराटे प्रशिक्षण, सामाजिक भान दर्शवणारे व्हिडिओ दाखवणे, तरुणांचे समुपदेशन करण्यासाठी शासनाने निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.