हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला व हिवरखेडा परिसरातील अनेक गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने ऑनलाईन कामांचा खोळंबा होत असून, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, या परिसरात टॉवर तीन किलोमीटर वर असून सुध्दा गावात नेटवर्क मिळत नाही.
सेनगाव तालुक्यातील केलसुला हिवरखेडा हे गाव ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे मोबाईल नेटवर्कची अडचण नित्याचीच आहे. केलसुला गावापासून तीन किलोमीटर अंतरावर साखरा या गावात जिओ, वोडाफोन कंपनीचा टॉवर आहे पण या टॉवरची रेंज नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे डिजिटल इंडिया होत आहे. मात्र केलसुला येथे रेंज मिळत नसल्याने ग्रामस्थांची ऑनलाईन ची सर्व कामे खोळंबत आहेत.
केलसुला हिवरखेडा परिसरात कुठल्याही प्रकारच्या नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी व तरुणांना ५ ते ६ किलोमीटर अंतरावर जाऊन ऑनलाईन कामे करावी लागतात. तसेच, शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बहुतांशवेळा ऑनलाईन स्वरुपात शिक्षण दिले जात असल्याने त्यांच्या परीक्षा ऑनलाईन स्वरुपात होत आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. परिसरात नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी वेळेवर परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. लवकरात लवकर मोबाईल टॉवर बसवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, युवक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.
ग्रामपंचायत केलसूला गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचे रेंज मिळत नाही. सदर गावातील लोकसंख्या ४५०० च्या जवळपास असून नागरिकांना या मोबईल कंपनीचा भूर्दंड भोगावा लागत आहे. तसेच विद्यार्थी, शासकीय ऑनलाईन सेवा यांचे ही नुकसान होत आहे. प्रशासनाला व मोबईल कंपनीचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. परंतु मोबईल कंपनी कोणतेही प्रकारची दखल घेत नाही.