सातारा – ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकीमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
दि. 28 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात असून दि. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायती तर जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. पाटण तालुक्यातील सर्वाधित 86 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने गावागावांत इच्छुकांची संख्या जास्त आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये जावळी तालुका 15, कराड 44, खंडाळा 2, खटाव 15, कोरेगाव 51, महाबळेश्वर 6, माण 30, पाटण 86, फलटण 24, सातारा 39, वाई तालुका 7 अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, निवडणूक जाहीर झालेल्या 319 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही, अशा सूचना उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी एका परिपत्रकाद्वारे संबंधितांना दिल्या आहेत.