चेन्नई -कसोटी संघातून बाहेर काढण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमनाची संधी देण्यात आली ती आयपीएल स्पर्धेतील त्याच्या कामगिरीसह चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या एका फोनवर. धोनीने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना फोन केल्याचे सांगितले जात आहे व त्यामुळेच हे घडले.
धोनीने बीसीसीआयच्या एका व्यक्तीला रहाणेला संधी देण्यास सांगितले व रहाणेसाठी जवळपास कायमचे बंद झालेले कसोटी संघाचे दार त्वरीत उघडले. सुरेश रैना, रुद्रप्रताप सिंग, रवींद्र जडेजा अशा कितीतरी खेळाडूंची कारकीर्द घडवण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. त्यातच कसोटी संघातून बाहेर गेलेल्या रहाणेची गुणवत्ता माहिती असल्याने धोनीने चेन्नईच्या संघ मालकांना यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कसोटी फलंदाज असा शिक्का बसलेल्या रहाणेला लिलावात आपल्या ताफ्यात घेण्यास सांगितले.
रहाणेने आयपीएल स्पर्धेत चेन्नईकडून खेळताना आपल्या वादळी खेळीने अनेकांना चकित केले. इथेच धोनीची त्याच्यावरची मर्जी आणखीनच वाढली व त्याचे कसोटी संघातही पुनरागमन व्हावे यासाठी धोनीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली. धोनीने द्रविड यांच्याशी फोनवर संपर्क साधला व रहाणेबाबत बोलणी केली. श्रेयस अय्यरला झालेली दुखापत रहाणेच्या समावेशासाठी पथ्यावर पडली.
इंग्लंडमधील अनुभव निर्णायक ठरला
रहाणेचा इंग्लंडमधील खेळण्याचा अनुभव मोठा असल्याने द्रविड यांनीही बीसीसीआय व निवड समितीचे हंगामी प्रमुख शिवसुंदर दास यांना सूचित करत रहाणेसाठी भारताच्या कसोटी संघाची कवाडे खुली केली. तसेच सूर्यकुमार यादवला कसोटी संघात स्थान देण्यात येणार असल्याचे संकेत होते. मात्र, त्याची कामगिरी सुमार झाल्याने रहाणेच्याच नावावर द्रविड यांनी शिक्कामोर्तब केले व धोनीचा एक फोन रहाणेसाठी सार्थकी लागला.