नवी दिल्ली – महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे भारतीय क्रिकेटचेच नुकसान झाले आहे. येत्या काळात धोनीचा वारसदार शोधला गेला पाहिजे. त्याच्यासारखी गुणवत्ता असलेल्या खेळाडूची संघाला नितांत गरज आहे, असे मत माजी कसोटीपटू साबा करीम यांनी व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यामागे धोनीची भूमिका महत्त्वाची होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रमही केला. त्याने निवृत्ती घेतल्याने आता जी पोकळी संघात निर्माण झाली आहे ती वेळेत भरली गेली पाहिजे. त्याचा शांत स्वभाव, क्रिकेटची जाण हे गुण आता कोणत्या खेळाडूमध्ये गवसतील हे सांगता येत नाही. मात्र, धोनीचा पर्याय लवकरात लवकर मिळाला तरच भारतीय संघ यशात सातत्य राखू शकतो, असेही ते म्हणाले.