पिंपरी -लहानपणी सुरू केलेली विठ्ठलभक्ती काहीही झाले तरी सुटणार नाही. असा स्वतःशीच प्रण केलेल्या भक्ताची भगवंताने खरोखर परीक्षाच पहिली. पण भक्त देखील त्या परीक्षेला समर्पित भावनेने सामोरा जात आहे. माळशिरस तालुक्यातील 40 वर्षीय वारकरी पाय नसताना देखील आपल्या चार चाकाच्या गाड्यावर देहूतून पंढरपूरला खरडत खरडत निघाला आहे. पालखीसोबत तो देखील मंगळवारी (दि. 21) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला.
दीपक जालिंदर माने हे 40 वर्षांचे माळशिरस येथील विठ्ठलाचे पाईक वयाच्या नवव्या वर्षापासून म्हणजेच गेल्या 31 वर्षांपासून देहू ते पंढरपूर ही वारी दरवर्षी नित्याने करीत आहेत. सन 2009 मध्ये ते पुण्याला नोकरीच्या शोधात आले असताना त्यांचा लोकल ट्रेनमध्ये अपघात झाला. त्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पुढे त्यांचा पाय तोडावा लागला. धडधाकट दीपक अचानक अपंग झाले. दोन पायांवर उभाही राहू शकत नाही, तो आता वारीला कसा जाणार, असेच सगळे बोलू लागले. मात्र दीपक यांनी वारी चुकवायची नाही असा स्वतःशीच चंग बांधला.
लहान चाके असलेला हाताने ढकलता येईल असा एक गाडा त्यांनी बनवून घेतला आणि त्यावरून दरवर्षी त्यांनी देहू ते पंढरपूर ही वारी करण्याचे ठरवले. आता ते दरवर्षी देहू ते पंढरपूर अशी वारी करतात. केवळ देहू ते पंढरपूरच नव्हे ते पालखी माघारी फिरल्यानंतर ते पुन्हा देहूला येतात. तुकोबांचे दर्शन घेतल्यानंतर ते आपल्या गावी जातात. हा नित्यनेम मागील 31 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.
मी लहानपणापासून पांडुरंगाची भक्ती करतो. कदाचित पांडुरंगाला माझी परीक्षा घ्यायची असेल म्हणून त्याने मला असे अपंग बनवले. अपंग झाल्यावर कसा माझ्याकडे येईल, असाच काहीसा विचार पांडुरंगाने केला असेल. पण मी पांडुरंगाच्या परीक्षेला सामोरा जात आहे. मला त्याने भरपूर काही द्यावं हा त्यामागे माझा हेतू नाही, पण मला विठ्ठल भक्ती करायला मनापासून आवडते. माझ्यासाठी चांगल्या अंतःकरणाने केलेले प्रत्येक काम विठ्ठलभक्ती आहे. त्यामुळे वारी झाल्यावर वर्षभर मी जे मला चांगलं करता येईल ते करत राहतो.
– दीपक माने