मुंबई – सध्या परमबीर सिंग यांचा लेटरबाॅम्ब आणि रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग या मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर आज त्यांनी क्रिकेटच्या भाषेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
“मी लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बाॅलिंगही करायचो. फिल्डिंग करत असताना माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला खूप मजा येते. आता माझं ठरलंय, मी फास्ट बाॅलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शाॅट्सदेखील खेळणार आहे”, असे फडणवीस म्हणाले आहेत. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
मला लूज बाॅल मिळत आहेत –
“सध्याच्या परिस्थितीत इतके लूज बाॅल मिळत आहेत, की ते बाॅल मला बाॅन्ड्रीच्या बाहेर पाठवावेच लागतील. बाॅलिंगचं बोलायचं झालं तर, मी बाॅडीलाईन बाॅलिंग न करता अतिशय लाॅजिकल, ऑन द स्टम्प बाॅलिंग करतो. त्यामुळे समोरच्यांना बाॅलिंग करताना अडचण येते”,असेही त्यांनी म्हटले आहे.
रश्मी शुक्ला प्रकरणावरून सरकारला प्रश्न –
“चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची ? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडले यासाठी आम्ही चौकशी करू हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कोणाला पाठिशी घालत आहे हे स्पष्ट दिसतेय. जे व्यवहार झालेत, जे रॅकेट झालंय, त्यावर कारवाई करण्याची या सरकारची मानसिकता नाही”, अशी टीका करत रश्मी शुक्ला प्रकरणावरून राज्य सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न केला आहे.
“एखाद्या महिला अधिकाऱ्याला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का हे पाहिलं पाहिजे. पण जे बोलले आहेत, त्यांच्याकडून मार्यादेचा विचार करणेच मूर्खपणाचे आहे”, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, भाजपच्या काळात बेकायदेशीररीत्या केले फोन टॅप – नवाब मलिक
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला प्रकरणी बोलताना नवाब मलिक म्हणाले, “फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि पोलीस बदलीची नियमावली माहिती असताना खोटा रिपोर्ट देण्यात आला, त्याच्या आधारे सरकारला बदनाम करण्याचा कट कारस्थान करत आहेत. रश्मी शुक्लांच्या बाबतीत सांगत आहेत की, त्यांनी परवानगी घेऊन फोन टॅपिंग केलं. त्यांनी कोणतीही परवानगी न घेता 30 लोकांचे फोन टॅप करत होत्या. हा गुन्हा आहे. जेव्हा महाराष्ट्रात सरकार निर्माण करण्याचं संकट होतं तेव्हा सगळ्यांचे फोन टॅप करण्याचं काम रश्मी शुक्ला करत होत्या, कुठेतरी भाजपाच्या एजंट या नात्याने काम करत असताना त्यांना बेकायदेशीरपणे फोन इंटरसेप्ट करण्याची त्यांना सवय लागली होती. ज्या अहवालाचा उल्लेख फडणवीस करत आहेत त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता टॅपिंग सुरु होतं. तसंच उल्लेख झालेल्या 80 टक्के बदल्या झालेल्या नाहीत,” असे नवाब मलिक यांनी सांगितले.