हिंजवडी – शेवटच्या तळागाळातील शेतकऱ्याच्या शंका कुशंकांचे समाधान होत नाही, तोपर्यंत ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार नाही, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिले. आयटीनगरी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, युवा नेते सुरेश हुलावळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, पंचायत समिती सदस्य कोमल साखरे, माजी सरपंच मल्हारी साखरे, विद्यमान सरपंच विक्रम साखरे, उपसरपंच प्रतीक्षा घोटाकुले, नीलेश पाडाळे, राहुल जांभुळकर, अमित कंधारे, दिलीप हुलावळे, ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजने, तानाजी हुलावळे, उमेश साखरे, कुंडलिक जांभुळकर यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी व हिंजवडी ग्रामस्थ उपस्थित होते.
आयटीनगरीतील वाढते नागरीकरण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत सर्वच विभागाशी पत्रव्यवहार करून रस्ते, मेट्रो, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या 17 सप्टेंबरला पुण्यात बैठक घेणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, हिंजवडी आयटीशी संबंधित समस्यांबाबत आता जम्बो प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पिंपरी-चिंचवड व पुणे महानगर व इतर संस्थांना एकत्रित घेऊन, विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. हिंजवडीतील प्रश्न सोडविण्यासाठी कोविडनंतर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हिंजवडीत पुन्हा आयटी आसोसिएशन व प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे त्यांनी जाहीर केले.
या वेळी ग्रामस्थांच्या वतीने शामराव हुलावळे, संतोष साखरे व वसंत साखरे यांनी पीएमआरडीएच्या वतीने नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत असलेली प्राधिकरणाची भूमिका व तक्रारी सुळे यांच्यासमोर आपल्या मनोगतात मांडल्या. या वेळी त्यांनी हिंजवडीचा पाणी प्रश्न, पर्यायी रस्ते, मैला शुद्धीकरण प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, कोविड काळात एकेरी वाहतूक काही काळासाठी बंद करून दुहेरी वाहतूक सुरू करण्याबाबतची मागणी सुळे यांच्याकडे केली.
राष्ट्रवादी भोर मतदार संघाचे अध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, “पीएमआरडीए’चा प्रस्तावित आराखडा हा बिल्डर धार्जिना आहे. तर शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. त्याबाबत शंका निरसन करण्यासाठी 7 सप्टेंबर रोजी पीएमआरडीए कार्यालयात सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येईल. तिथे सर्व गावच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भूमिका मांडाव्यात.
शरद जांभुळकर यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच विक्रम साखरे यांनी आभार मानले.