हेडिंग्ले – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ हेडिंग्ले मैदानावर कसोटी पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. वाचून धक्का बसला असेल; पण हे खरे आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघातील एकाही खेळाडूला या मैदानावर कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही. संघातील सगळेच खेळाडू पहिल्यांदाच या मैदानावर कसोटी खेळणार असल्याने एक प्रकारे संपूर्ण भारतीय संघाचे या मैदानावरील कसोटी पदार्पण ठरणार आहे.
हेडिंग्ले मैदानावर भारताने गेल्या 53 वर्षात एकही कसोटी गमावलेली नाही. भारताचे या मैदानावरील विक्रम आजही अन्य संघांना करता आलेले नाहीत. मात्र, सध्याच्या संघातील एकाही खेळाडूला येथे कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही.
भारतीय संघात सध्या अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. अनुभवी खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, महंमद शमी, रवीचंद्रन अश्विन असे खेळाडू असेल तरी यापैकी एकाकडेही हेडिंग्ले येथे कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात या मैदानावर अखेरची कसोटी 19 वर्षापूर्वी म्हणजे 2002 साली खेळली गेली होती. तेव्हा सध्या संघात असलेला एकही खेळाडू नव्हता. त्यामुळे या मैदानावर भारत ज्या 11 खेळाडूंना मैदानात उतरवेल त्या सर्वांचे पदार्पण ठरेल. भारताने 2002 साली या मैदानावर विजय मिळवला होता. तेव्हा अनिल कुंबळेने 7, तर हरभजन सिंगने 4 बळी घेतले होते.