आनंदराज आंबेडकर : धार्मिक स्थळाप्रमाणे शासनाने लक्ष द्यावे
शिक्रापूर (वार्ताहर)- राज्य शासन धार्मिक स्थळांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, देशभरासह जागतिक ठेवा असलेल्या व कोट्यवधी बांधवांचे स्फूर्तीस्थान असलेल्या ऐतिहासिक विजय रणस्तंभाचा विकास अद्यापही कागदावर राहिला आहे. नवीन सरकारने हे स्थळ धार्मिक स्थळांप्रमाणेच विकसित करण्याची जबाबदारी आहे. याठिकाणी येणाऱ्या समाजबांधवांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी महामार्गावर उड्डाणपूल बांधावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
आनंदराज आंबेडकर म्हणाले की, दि. 1 जानेवारी 1818 मध्ये याठिकाणी घडलेला इतिहास हा आमच्या शौर्याचे प्रतिक आहे. याठिकाणी देशभरासह आता जगभरातून समाज बांधव मानवंदना देण्यासाठी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1927 पासून याठिकाणी दरवर्षी 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी येत होते. या क्रांती स्तंभाचे व लढाईतील अनेक पुरावे आजही इंग्लड येथील सेंट्रल लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, हा विजय रणस्तंभ आजही विकासापासून वंचित आहे. आंबेडकरी समाज हा समतावादी व सामाजिक क्रांतीचा समाज आहे. या ऐतिहासिक विजय रणस्तंभास पुरातत्व विभागाने वेगळा दर्जा देत नवीन सरकारने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी विकास आराखडा तयार करावा व त्यावर अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गतवर्षीच्या वाहतूक कोंडीबाबत शासनाने काम करण्याची गरज असताना पुणे-नगर महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. याठिकाणी येणाऱ्या लोकांच्या जबाबदारीसाठी शासनाने समिती तयार करून समितीत आमच्यासारख्यांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन यावेळी केले.