पुणे – “तालिबानने आमच्या घोर या प्रदेशाचा ताबा घेतल्यानंतर तेथील संपर्क यंत्रणा निकामी केली आहे. आज एक आठवड्यापासून मी माझ्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकले नाही. मला शिक्षण पूर्ण करून मायदेशी जाऊन नोकरी करायची आहे, माझ्या कुटुंबीयांना मदत करायची आहे. मात्र, आता तालिबानने त्याठिकाणी ताबा घेतल्याने हे शक्य होईल की, असा प्रश्न पडला आहे? या घटनेमुळे “उद्ध्वस्त झाल्याची’ भावना असून, आता पुढे काय करायचे हेच कळत नाही, अशी भावना पुण्यात शिक्षण घेणाऱ्या अझिझा शेरुराह या अफगानी विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे.
तालिबानी संघटनांनी अफगाणिस्तानचा ताबा मिळविल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे इतर देशांमध्ये राहत असलेल्या अफगाणी नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात शिक्षण घेणाऱ्या काही अफगाणी विद्यार्थ्यांशी “प्रभात’ने संवाद साधला. यावेळी सिम्बॉयोसिस महाविद्यालयात “एमबीए’चे शिक्षण घेणारी अझीझा म्हणाली, “अफगाणिस्तानात तालिबानचे आक्रमण ही अगदी अनपेक्षित घटना आहे.
जगात तालिबानची ओळख ही कुख्यात दहशतवादी संघटना अशीच आहे. अतिशय हिंसक आणि कट्टर प्रवृत्तीच्या या संघटनेकडून महिलांवर गंभीर अत्याचार केले जातात. ज्या ज्या भागाचा त्यांनी ताबा घेतला आहे, त्या भागांमध्ये महिलांना काम करण्यास, घराबाहेर पडण्यासाठी मुभा नाही.
अशा वेळी मी जर माझ्या देशात पुन्हा गेले, तर ते मलाही मारून टाकतील कारण मुलींनी शिक्षण घ्यावे, तेही परदेशात हे त्यांना अजिबात मान्य नाही.’ फरझाना अमिरी या विद्यार्थिनीनेदेखील सद्यपरिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
“व्हिसा’ मुदतवाढीसाठी प्रयत्न करणार
अफगानिस्तानातील सद्यस्थिती पाहता अनेक विद्यार्थी जे अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत, त्यांना मायदेशी परतणे अवघड झाले आहे. त्यातच अनेकांच्या शैक्षणिक “व्हिसा’ची मुदत लवकरच संपणार आहे.
अशा विद्यार्थ्यांना परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत भारतात राहण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पुण्यातील अफगानी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख इशाक घयूर यांनी दिली.