लोणीकंद, (वार्ताहर)- लोणीकंद-आळंदी रस्त्यावरील श्रीक्षेत्र तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलावरून अवजड वाहतूक बंद असतानाही सर्रास अवजड वाहने व अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. पुलाचे आयुर्मान संपलेले असून, पूल कमकुवत बनला असताना अवजड वाहतुकीने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुलावरून वाहतूक बंद राहावी, म्हणून काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्या माध्यमातून पुलाचे दोन्ही बाजूला लोखंडी बार लावले होते.
केवळ हलकी वाहनेच या पुलावरून सुरू होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्रास वाहने येजा करत आहेत. काहींनी पुलाच्या दोन्ही बाजूला लावलेले लोखंडी बार काढून टाकले असून आता दोन्ही बाजूने ये-जा सुरू आहे. मरकळ-धानोरे-शिक्रापूर-वाघोली ते भोसरी तसेच चाकण भागातून इंद्रायणी नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.
शेतमालाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर ब अवजड वाहतूक करणारे डंपरची वर्दळ सतत असते. प्रशासन वारंवार वाहतूक बंदीचा आदेश काढतात; मात्र, कारवाई काहीच नसल्याचे चित्र आहे. पुलाचे आयुर्मान संपल्यामुळे पूल धोकादायक आहे.
तरीही जीवाची पर्वा न करताच वाहतूक केली जात असल्याने अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. इंद्रायणी नदीवरील पुलाचे आयुर्मान संपले असताना त्यावरून होणार्या अवजड वाहतुकीने जर एखादा अपघात झालाच तर याला जबाबदार कोण असा नाहक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पोलिसांचे लक्ष कशावर…?
इंद्रायणी नदीच्या पुलाच्या कडेलाच खेड हद्दीत पोलीस प्रशासन ब्यारिगेट लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. अवैध वाहतुकीवर, फिल्मिंग काचांवर कारवाई करताना पोलीस दिसतात; मात्र याच पुलांवर पोलिसांच्या डोळ्यासमोर प्रमाणापेक्षा जड वाहतूक पोलिसांना दिसत नाही का? अवैध जड वाहतूकदारांचे पोलिसांशी आर्थिक हितसंबंध आहेत का? असा गहन प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आज अखेर ७ ते ८ वेळेस पुलाच्या दोन्ही साईटला बॅरीगेट बसविण्यात आले होते; मात्र काहीच दिवसांनंतर समाजकंटकांच्या माध्यमातून बॅरीगेट तोडून टाकण्यात येत आहे. वारंवार बॅरीगेट तोडण्याच्या घटना घडत असल्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. बंदोबस्त मिळताच पुलावर त्वरित पुन्हा बॅरीगेट बसविण्यात येतील. -जानवी रोडे, सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग