मुंबई -ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या जून महिन्यात होत असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळण्याची इच्छा आहे. भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याबाबत मी आशावादी असून त्यापूर्वी निवड समितीला प्रभावीत करण्यासाठी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी मेहनत घेणार आहे, अशा शब्दात आजिंक्य रहाणेने आपल्या भावना बोलून दाखवल्या.
आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना मुंबई डियन्सविरुद्ध वादळी अर्धशतकी खेळी केल्यावर पुन्हा एकदा मला लय गवसली आहे. खरेतर या सामन्यासाठी मला अंतिम 11 खेळाडूंत संधी मिळेल असे वाटले नव्हते परंतू महेंद्रसिंह धोनीने विश्वास दाखवला व मला संधी मिळाली.
मला संघाच्या विजयात मोलाचा वाटा घेता आला याचे समाधान तर आहेच परंतू खूप मोठ्या कालावदीनंतर मी अशी खेळी केली त्यामुळे मला नवा आत्मविश्वासही मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांचा काळ खूप खडतर होता आता त्यातून बाहेर येत पुर्ण सकारात्मकतेने खेळणार आहे, असे रहाणे म्हणाला.
भारताच्या कसोटी संघात पुनरगगमन करण्याची तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची इच्छा आहे. मला इंग्लंडमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे त्यामुळे निवड समिती मला संधी देइल असा विश्वासही आहे. या सामन्याचा अद्याप मोठा कालावधी असून त्यापूर्वी मला खेळायला मिळतील त्या प्रत्येक संधीचा लाभ मला घ्यायचा आहे, असेही रहाणेने सांगितले. रहाणे गेल्या वर्षी जानेवारीनंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर होत आहे.
…तरीही रहाणेची निवड होऊ शकते
रहाणेचा सुमार फॉर्म पाहता बीसीसीआयने यंदा जाहीर केलेल्या करारपात्र खेळाडूंच्या यादीतून त्याला वगळले होते. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला करार मिळाला होता. तसेच त्याला संघातही स्थान मिळाले होते. मात्र, आता त्याला दुखापतीमुळे आयपीएल पाठोपाठ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे. त्यातच भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील दुखापतीमुळे या सामन्यात खेळता येणार नसल्याने रहाणेला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.