नवी दिल्ली – करोनामुळे जगभर निराशाजनक मानसिकता निर्माण झाली आहे. अनेकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. ही निराशाजनक मानसिकता केवळ क्रीडाक्षेत्रामुळेच दूर होईल, असा विश्वास भारताचा ऑलिम्पिकपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केला आहे.
करोनाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. त्यामुळे क्रीडाक्षेत्राची देखील खूप हानी झाली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील जवळपास प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांचे रोजगार गेले असून पगार कपात व उपासमारी देखील वाढली आहे. अशा स्थितीत प्रत्येकाचीच मानसिकता निराशाजनक झाली आहे. यातून सर्वांना बाहेर येण्यासाठी क्रीडाक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मतही बिंद्रा याने व्यक्त केले आहे.
जगभरात आजवर झालेल्या प्रत्येक विपरीत गोष्टींमधून क्रीडाक्षेत्रानेच लोकांना बाहेर काढले व त्यांना सकारात्मक बनवले. एकदा करोनाचा नायनाट झाला की प्रत्यक्ष क्रीडास्पर्धांना सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा संपूर्ण जग व सर्व व्यवहार रुळावर येतील, असेही बिंद्राने सांगितले.