सातारा – युवा पिढीत दारू, ढाबा संस्कृती रुजवणाऱ्या आणि मतदारांना आमिषे दाखविणाऱ्या कोरेगावातील महायुतीच्या उमेदवाराला मतदार कायमचा हद्दपार करतील, असा विश्वास कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
किन्हई पंचायत समिती गणात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, सत्तेच्या व मोहाच्या मागे जाणारी माझी वृत्ती नाही.
साताऱ्यातील दोन्ही राजे भाजपमध्ये गेले, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस संपली, अशा आवया उठवण्यात आल्या; परंतु ते गेले तरी मावळे राष्ट्रवादीतच आहेत. राजांनी पक्षांतर करू नये, असा आमचा व जनतेचा आग्रह होता. मात्र, त्यांनी आम्हाला झुगारले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यांनी उभ्या केलेले गडकिल्ले लग्नकार्ये, हॉटेलांसाठी भाड्याने देण्याचा घाट युती सरकारने घातला आहे. त्यामुळे राज्यातील युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राजकारणात लोकांसाठी झिजावे लागते, विकास करावा लागतो; परंतु कोरेगावात महायुतीच्या उमेदवाराने लोकांना भुलवण्याचे काम सुरू केले आहे. राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य असताना सहा महिन्यातच तेथील मतदारांना त्याने वाऱ्यावर सोडले होते. परदेशात निघून जाणारा हा स्वयंघोषित भूमिपुत्र आता पैशाच्या जोरावर मतांचा जोगवा मागत आहे. गेल्या दहा वर्षात गावागावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून मी मतदारांचा विश्वास मिळवला आहे. भाडळे खोऱ्यातील साधी व प्रामाणिक माणसे विकासाच्या मागे उभी आहेत.
कितीही ताण… येत नाही बाण….
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावे व वाड्यावस्त्यांमध्ये आ. शिंदे यांच्या पदयात्रा व कोपरा सभा होत असून त्यांना लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. “कितीही ताण… येत नाही बाण…’ अशी घोषणा युवक प्रचारात देत असून ही घोषणा मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे