नवी दिल्ली – भारत बंदच्या निमित्ताने देशातल्या विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी आज केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात तसेच आर्थिक धोरणांच्या विरोधात जंतरमंतरवर उग्र निदर्शने केली.
कामगार संघटनांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला. शेतकरी एकता कायम राहो, शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घ्या अशा मागण्यांचे फलकही त्यांनी फडकावलेले दिसले. या निदर्शनांमध्ये ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स, सीटू, ऑल इंडिया किसान सभा, जनवादी महिला समिती, युनायटेड ट्रेड युनियन कॉंग्रेस, आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या भाषणांमध्ये विविध वक्त्यांनी मोदी सरकारच्या मनमानी कारभाराचा धिक्कार केला. या सरकारने आर्थिक सुधारणांच्या नावाने सारा देशच विकायला काढला आहे, पूर्वी तोट्यात जाणारे उद्योग बंद केले जायचे आता सर्रान नफ्यात चालणारे सरकारी उपक्रमही बंद पाडले जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.