नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला (मंगळवार) भारत बंद पुकारला आहे. त्या बंदला 10 केंद्रीय कामगार संघटना आणि 5 डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
इंटक, आयटक, एचएमएस, सिटू, एआययूटीयूसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ आणि यूटीयूसी या कामगार संघटना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत.
त्या संघटनांनी कामगार संहिता आणि कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी 26 नोव्हेंबरला देशव्यापी संप केला. दरम्यान, माकप, भाकप, भाकप(एम-एल), आरएसपी आणि एआयएफबी या डाव्या पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
वादग्रस्त ठरलेले तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या शेतकऱ्यांची मागणी योग्य असल्याचे डाव्या पक्षांनी म्हटले आहे.