नवी दिल्ली – भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची कारागृहातून त्वरित सुटका करावी या मागणीसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दिल्लीत जंतरमंतर येथे जोरदार निदर्शने केली.
यावेळी पोलिसांनी आमच्यावर बळाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असा आरोप संघटनेने केला आहे. या निदर्शनात संघटनेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सुमित कटारिया, सेक्रेटरी प्रितीश मेनन, जवाहरलाल नेहरु विद्यापीठा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ऐषे घोष अदि विद्यार्थी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले आहे असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर कलम 41अ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
आम्ही आमच्या न्याय मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असताना आमच्यावर पोलिसी बळाचा वापर केला गेला असा आरोप या विद्यार्थी संघटनेने केला आहे.