छत्रपती संभाजीनगर – मत हे लोकशाहीचा आत्मा असून आपण दिलेले मत हे नेमके कुणाला जाते हे कळत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत देशातील लोकशाही धोक्यात आहे. त्यासाठी ईव्हीएम मशिन हटवणे गरजेचे आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार देशातील १९ लाख ईव्हीएम मशिन्स चोरीला गेले आहेत.
त्यामुळे येणार्या आगामी काळात होणार्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या मागणीसाठी पक्षाच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव संदेशाच्या माध्यातुन जनजागृती करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत पुढे आंबेडकर म्हणाले जे पक्ष संविधानप्रेमी आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आगामी निवडणुका लढवू.
आगामी काळात होणार्या निवडणुकांना किमान तीन महिने तरी विलंब आहे. पक्षाच्या वतीने आम्ही निवडणुका लढवणार असून लातुर, संभाजीनगर, अमरावती, या जांगासाठी पक्षाचे उमेदवार असणार आहे.
धर्माचा उन्माद सुरू
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. परंतु सद्यस्थितीतील सरकार हे शासकीय यंत्रणेचा वापर करून धार्मिक उन्माद करत आहे. देशातील सर्वोच्च न्यायालय हे अॅक्टीव्ह असून न्यायालयाने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरच धर्मनिरपेक्षतेला तडे जाणार नाहीत, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.