नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाच्या चाहत्यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हटवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर द वॉल राहुल द्रविड याला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात यावे, असेही मत चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
आजवर शास्त्री यांनी खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी काय केले. ते ड्रेसिंगरूममध्ये अनेकदा झोपलेलेही दिसले आहेत. तसेच त्यांच्या बोलण्यातील तसेच वर्तनातील अहंकार सातत्याने दिसून आला आहे. त्यांचे कर्णधार विराट कोहलीशी जमते. मात्र, त्यांना संघातील सर्व खेळाडूंशी जमवून घेता आलेले दिसत नाही. त्यांचे काही सल्ले व निर्णय संघासाठी लाभदायक ठरलेले नाहीत हे स्पष्ट होत आहे. भारतीय संघाच्या आजवरच्या कामगिरीत शास्त्री यांनी असे काय योगदान दिले, अशीही विचारणा चाहत्यांनी केली आहे.
दुसरीकडे द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कार्यरत असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताचा सेकंड बेंच तयार झाला. स्वतःच्या कारकिर्दीत द्रविडने कसोटीचा स्पेशालिस्ट फलंदाज अशी ख्याती मिळवली. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत तर अनेक सामने वाचवलेही आहेत. अशाच तंत्रशुद्ध मार्गदर्शकाची सध्याच्या भारतीय संघाला जास्त गरज आहे. त्याला प्रशिक्षक बनवले तरच भारतीय फलंदाजांना कसोटी क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करायची असते ते लक्षात येईल.
शास्त्री यांना अन्य काही गोष्टी करण्यातच रस आहे, प्रशिक्षक म्हणून संघासाठी कार्यरत राहण्यात तसेच सुमार कामगिरीनंतर त्यांना आपल्या चुकांची माहिती देणे तसेच खेळाडूंच्या मानसिकतेत सकारात्मता आणणे कधी जमलेच नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्यांना हटवून द्रविडकडे ही जबाबदारी सोपवावी, असेही मत चाहत्यांनी व्यक्त केले.