फलटण – बेकायदेशीर ऊस वाहतुकीबाबत कारखानदार, वाहन चालक, मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे यांच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना लेखी निवेदनही देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहर व तालुक्यात एकूण चार साखर कारखाने आहेत. त्या सर्व साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच बैलगाडी या वाहनांचा वापर केला जातो. सदर कारखान्यांना ऊस वाहतूक करताना ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडी या सारखी वाहने वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाहीत, सदर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून ही वाहने भरधाव वेगाने मोठ मोठ्या आवाजात स्पीकर लावून रस्त्याने जात असतात, तसेच एका ट्रॅक्टरला सुमारे दोन-तीन ट्रॉल्या जोडून पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर न लावता बेकायदेशीरपणे ऊस वाहतूक करत आहेत.
यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहेत. या बेकायदेशीर ऊस वाहतुकीमुळे नाहक बळी जात आहेत. यापुढेही अनेक वाहनचालकांचा अपघात होऊन बळी जाऊ शकतो. दरम्यान, चार दिवसात फलटण शहर व तालुक्यातील बेकायदेशीर चालू असलेली ऊस वाहतूक तात्काळ बंद करावी व संबंधित वाहन चालक मालक व कारखानदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, याचा गांभीर्याने विचार न झाल्यास, तसेच या बेकायदेशीर ऊस वाहतुकीमुळे कोणताही अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी शासनाला जबाबदार धरण्यात येईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती परिवहनमंत्री प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.