शिरवळ – पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने खंडाळा तालुक्यात शेतीचे तीन कोटी 20 लाख 41 हजार 627 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार दशरथ काळे यांनी दिली. या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
गेल्या चार महिन्यांमध्ये खंडाळा महसूल मंडळात 1111.90 मिमी, वाठार बुद्रुक महसूल मंडळात 789.60 मिमी, शिरवळ महसूल मंडळात 1323.60 मिमी, लोणंद महसूल मंडळात 853.90 मिमी, अशा एकूण 4079.00 मिमी पावसाची नोंद खंडाळा तालुक्यात झाली आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे तालुक्यात जिरायती, बागायती क्षेत्रातील पिकांचे तीन कोटी 20 लाख 41 हजार 627 रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील नऊ हजार 454 शेतकऱ्यांच्या दोन हजार 738.55 हेक्टर क्षेत्रातील जिरायत पिकांचे एक कोटी 86 लाख 22 हजार 140 रुपयांचे तर चार हजार 463 शेतकऱ्यांच्या एक हजार 876.11 हेक्टर बागायत क्षेत्राचे एक कोटी 32 लाख 38 हजार 407 रुपयांचे नुकसान झाले आहे.
13 शेतकऱ्यांचे 10.06 होक्टर क्षेत्रावरील फळबागांचे एक लाख 81 हजार 80 रुपयांचे नुकसान झाले आहे. जिरायती क्षेत्रात 11.20 हेक्टरमधील भात, 2100 हेक्टरमधील बाजरी, 180 हेक्टरमधील सोयाबीन, 192 हेक्टरमधील भुईमूग, 178.5 हेक्टरमधील कडधान्य व 76.8 हेक्टरमधील ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. बागायती क्षेत्रातील भात 13.8 हेक्टर, बाजरी 400.38 हेक्टर, सोयाबीन 56.43 हेक्टर, भुईमूग 104 हेक्टर, कडधान्ये 18 हेक्टर, भाजीपाला 912.5 हेक्टर, ऊस 71.77 हेक्टर, मका 198.81 हेक्टर, ज्वारी 100.8 हेक्टर असे नुकसान झाले आहे, अशी माहिती दशरथ काळे यांनी दिली.