नवी दिल्ली – देशभरातील स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वेने आत्तापर्यंत 3276 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडल्या असून त्यातून 42 लाख स्थलांतरित मजुरांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. यात सर्वाधिक गाड्या गुजरातमधून सोडण्यात आल्या आहेत.
आज प्राप्त आकडेवारीनुसार गुजरातमधून 897, महाराष्ट्रातून 690, पंजाबातून 358, उत्तरप्रदेशातून 232 आणि दिल्लीतून 200 गाड्या सोडण्यात आल्या. यातील सर्वाधिक गाड्या उत्तरप्रदेशसाठी सोडण्यात आल्या असून त्या राज्यात आत्तापर्यंत 1428 गाड्या आल्या आहेत. बिहारमध्ये 1178, झारखंडमध्ये 164, ओडिशात 128, आणि मध्यप्रदेशात 120 गाड्या आल्या आहेत. राज्य सरकारांच्या विनंतीनुसारच या गाड्यांचे नियोजन केले जाते.
या गाड्या आपल्या नियोजित मार्गाने जाण्याऐवजी दुसऱ्याच मार्गाने दुसऱ्याच स्टेशनवर पोहचत असल्याचे अनेक प्रकार उघडकीला आले आहे. काही प्रसार माध्यमांच्या म्हणण्यानुसार 40 रेल्वे गाड्यांचे मार्ग चुकले आहेत. या गाड्या नियोजित स्थानकांवर पोचण्यासही प्रचंड विलंब होत असून काही गाड्यांना 60-60 तासांपेक्षाही अधिक विलंब लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या गाड्यांमधील प्रवाशांनी रेल्वे मार्ग रोखून धरण्याचेही प्रकार ठिकठिकाणी घडले आहेत.
या गाड्यांना विलंब झालेला असतानाही प्रवाशांना जेवण आणि पाण्याचीही सोय न करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. तथापि रेल्वे मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे गाड्यांना उशीर होण्याचे प्रमाण वाढले होते पण आता ही समस्या सोडवण्यात आल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.