- दंगलखोरांकडून सर्रास गोळीबार
- पोलिसांसह सुमारे दोनशे जखमी
- पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक सुरूच
- पत्रकारांवर हल्ले : एकावर गोळीबार
नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायदा (का) विरोधक आणि समर्थक एकमेकांना भिडल्याने गेले तीन दिवस दिल्ली धुमसत आहे. यात मरण पावलेल्यांची संख्या दहावर पोहोचली असून सुमारे 130 नागरिक जखमी झाले आहेत. गुरू तेजबहादूर रूग्णालयात मंगळवारी चार जखमींचा मृत्यू झाला. सोमवारी या दंगलीत पाच जण मरण पावले होते. याशिवाय 56 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांन गोळ्या लागून जखमा झाल्या आहेत. उत्तर पूर्व दिल्लीत अनेक पत्रकारांवरही हल्ले करण्यात आले असल्याचे वृत्त असून एका पत्रकारावर गोळीबार करण्यात आला आहे. दिल्लीच्या कारावाल भागात एबीपी न्यूजच्या पथकावर हल्ला करण्यात आला.
या हिंसाचार करणाऱ्या पत्रकारांना धमक्या देत त्यांच्याकडील व्हिडिओ आणि छायाचित्रे डिलिट करायला लावली. उतर पूर्व दिल्लीतील तीन जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत हिंसाचार वाढल्याने अति सतर्कतेचा आदेश दिला आहे. जमावबंदी लागू करूनही परिस्थिती नियंत्रणात येत नाही. त्यामुळे तीन जिल्ह्यात अती सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. या तीन जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्टेशन हे चकमकींचे केंद्र स्थान बनले आहे. तेथे दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करत असून पेट्रोल बॉम्ब फेकत आहेत. काही वेळा दोन्ही बाजूकडून गोळ्या झाडल्या जात आहेत. दोन्ही बाजूकडून दगडफेक करणारे हेल्मेटचा वापर करत आहेत. लोखंडी सळ्या आणि काठ्यांचा सढळ वापर सुरू आहे. जखमींना घेडऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका सातत्याने दिसत आहेत. दुसऱ्या गटाचा एखादा तावडीत सापडला त्याच्यावर तुटून पडतात, असे चित्र आहे. पोलिस दंगलखोरांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करत आहेत. मात्र दंगलखोर चेहऱ्याला रुमाल बांधून आपल्या कारवाया करत आहेत.
परिस्थिती तणावग्रस्त आहे. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलिस कारवाईचे नेतृत्व करणारे सहआयुक्त अलोक कुमार यांनी सांगितले. मौजपूर मेट्रोस्टेशन जवळ मंगळवारी दुपारी जोरदार दगडफेक करण्यात आली. तर चार गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यात एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.