नवी दिल्ली – राजधानी परिसरातील हवेचा दर्जा अत्यंत खराब झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. ५ नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंजाब आणि हरियानात शेतात राब जाळण्याचा प्रकार या काळात सुरू होतो. त्याच्या धुराचे सारे प्रदुषण दिल्लीत पसरते.
Delhi Chief Minister Arvind Kejriwal: All schools in Delhi to remain closed till 5th November, following rise in pollution levels due to stubble burning. pic.twitter.com/hA78req2KK
— ANI (@ANI) November 1, 2019
पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने (ईपीसीए) दिल्ली-एनसीआरमध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. यानुसार बांधकाम आणि फटाके वाजवण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि ग्रेटर नोएडा येथे बांधकाम कामे थांबवली आहेत.
शिक्षण संचालनालयाने पत्रात म्हटले आहे की, ‘प्रदूषित वातावरणामुळे मुलांच्या आरोग्यावर दीर्घकाळासाठी परिणाम होऊ शकतो. प्रदूषण कमी होईपर्यंत मोकळ्या मैदानात कोणत्याही प्रकारचे आयोजन करू नये, अशा सूचना सरकारीसह सर्व खासगी शाळांच्या प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पंजाब आणि हरियानात शेतात राब जाळल्यामुळे त्याच्या धुराचे सारे प्रदुषण दिल्लीत पसरते. त्यामुळे गुदमरायला होते. अशा स्थितीतून वाचवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. कॅप्टन अंकल व खट्टर अंकलना पत्र लिहा आणि त्यात कृपया आमच्या आरोग्याची काळजी घ्या असे त्यांना लिहा असे केजरवाल यांनी म्हटले आहे. या प्रदुषणापासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्क वाटण्यात आले.