– वंदना बर्वे
“मन की बात’ने स्वच्छता, आरोग्य, महिला सशक्तीकरण आणि विकासाच्या अनेक मुद्द्यांना महत्त्व दिले आहे. त्यामुळे आज अनेक समुदायाचे लोक पुढे येत यावर काम करत आहेत, अशा शब्दात मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनीही “मन की बात’साठी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. यावरूनच देशवासीयांसाठी “मन की बात’चे महत्त्व अधोरेखित होते.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित झाला. संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्कमधील मुख्यालयातही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले गेले. आकाशवाणीवर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसारित होणाऱ्या “मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100व्या भागाच्या पार्श्वभूमीवर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी झाले होते. तसेच आतापर्यंत प्रसारित झालेल्या “मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 700 पेक्षा अधिक लोकांशी संवाद साधला आहे. यासह 300 संघटनांचा उल्लेख केला असून यामधील 37 व्यक्ती आणि 10 संस्था परदेशी आहेत. रविवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये चार सत्रे होती. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यापैकी पहिले पुस्तक “मन की बात ऽ 100′ हे कॉफीटेबल पुस्तक आहे आणि यामध्ये या कार्यक्रमाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या कार्यक्रमामुळे पंतप्रधान आणि सामान्य नागरिक यांच्या दरम्यानच्या थेट संवादाला उत्तेजन देण्याचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय परिषदेत, देशाच्या विविध भागातील 100 सन्माननीय नागरिक सहभागी झाले. या सर्वांचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या “मन की बात’च्या विविध भागांमध्ये उल्लेख केला आहे. या व्यक्तींनी देश उभारणीत दिलेल्या विशेष योगदानाची दखल पंतप्रधानांनी आपल्या मासिक संवाद कार्यक्रमातून वेळोवेळी घेतली आहे. “मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित झाला तो सोहळा अनेक कारणांनी अविस्मरणीय ठरला आहे.
अनिवासी भारतीयांसाठी “मन की बात’चे प्रसारण करण्यात आले. न्यूयॉर्कमधील स्थानिक वेळेनुसार “मन की बात’चे प्रसारण केले गेले. दर महिन्याची “मन की बात’ एक राष्ट्रीय परंपरा बनल्याचे भारताच्या स्थायी मिशनने म्हटले आहे. विकास यात्रेत आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी कोट्यवधी भारतीयांना प्रेरित करण्याचे काम हा कार्यक्रम करतो. संयुक्त राष्ट्राशिवाय न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासातही अनिवासी भारतीयांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले.
“मन की बात’चा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला होता. यानंतर दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी याचे थेट प्रसारण सुरू झाले. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून याच्या 30 मिनिटांच्या भागाचे थेट प्रक्षेपण केले जाते. याच्या 100 व्या भागाच्या प्रसारणाच्या निमित्ताने 26 एप्रिल रोजी प्रसार भारतीने एक कॉन्क्लेव्ह आयोजित केली होती. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले होते. पुण्याचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या 16 हजार रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनातून दरमहा 5 हजार रुपये स्वच्छता मोहिमेसाठी देण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपूरचे बंडू सीताराम धोत्रे “पर्यावरण संरक्षण संघटना’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेने, चंद्रपूरचा किल्ला आणि आसपास स्वच्छता मोहीम राबवली. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार आहे.
राजेंद्र यादव हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करून लसीकरणासाठी उपयुक्त वाहन तयार केले. पुण्याचे डॉ. बोरसे हे कोविड योद्धा आहेत. चंद्रकिशोर पाटील यांच्या नाशिकमध्ये गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता. अलिबागजवळील केनाड येथील रहिवासी असलेल्या शर्मिला ओस्वाल गेल्या 20 वर्षांपासून अनोख्या पद्धतीने भरड धान्यांचे उत्पादन करत असून त्यांना “मिलेट्स वूमन’ म्हणून त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. वेम्पती यांनी लिहिलेले “कलेक्टिव्ह स्पिरीट, कॉंक्रीट ऍक्शन’ या पुस्तकामध्ये “मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांच्या हृदयात असलेल्या ज्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच तंदुरुस्तीविषयक समस्यांसह विविध संकल्पनांवर चर्चा केली, त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एकूणच या सर्वच घडामोडीमुळे “मन की बात’ देश वासियांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला आहे.